हे सरकार पोकळ पॅकेजची घोषणा करणारे नाही: उद्धव ठाकरे |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, राज्याला संबोधित केले. पॅकेजची मागणी केली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार हे पोकळ पॅकेजची घोषणा करणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
मुंबई: काही लोकांकडून पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, आतापर्यंत अनेक पॅकेजची घोषणा करण्यात आली. वरून छान दिसणारे पॅकेज उघडले की रिकामा खोका दिसतो. महाविकास आघाडीचे सरकार हे अशा पोकळ पॅकेजची घोषणा करणारे नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. हा संकटाचा काळ आहे. कुणीही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, रविवारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ईद घरात बसूनच साजरी करण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांत करोना रुग्ण वाढले. करोनासोबत जगायला शिका, हे मी सांगत आहे. मार्च-एप्रिलपासून करोना संकट राज्यावर आलं. आता अचानक रुग्णांची संख्याही वाढली. हा विषाणू गुणाकार करत जातो. त्याला मर्यादा नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख करोना रुग्ण असतील, असा इशारा देण्यात आला होता. आज ३३ हजार ७८६ रुग्ण सक्रिय आहेत. ४७ हजार एकूण रुग्ण आहेत. तर जवळपास १३ हजार करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून, करोनाग्रस्त गर्भवतींची बालके करोनामुक्त आहेत. हा निसर्गाचा चमत्कार आहे. मुंबईत नव्वदीच्या आजी करोनाला हरवून घरी आल्या, असं ते म्हणाले. करोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे. सध्या सात हजार, तर मे अखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं. फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय आहे. राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे. पुढील आठ ते दहा दिवस पुरेल असा रक्तसाठा आहे. पुढील काळात रक्ताची आवश्यकता भासेल. इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
No comments:
Post a Comment